लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी अनेक पर्यांयांपैकी एक उत्तम पर्याय म्हणजेच NDA नॅशनल डिफेन्स ॲकॅडेमी किंवा राष्ट्रीय रक्षा अकादमी केंद्रसरकारद्वारा संचालित या संस्थेत भारतीय लष्करी अधिकारी घडवले जातात. या संस्थेची स्थापना महाराष्ट्रात पुणे येथे करण्यात आली आहे. येथे शारिरीक, मानसिक तसेच शैक्षणिक शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. जवाहरलाल नेहरु विद्यापिठाची BSC,BA किंवा BComची डिग्री विद्यार्थ्यांना प्राप्त होते. तीन वर्षांचा असा एकूण येथील प्रशिक्षण कालावधी आहे.
पुर्वतयारी:
सर्व साधारणपणे प्रत्येक विद्यार्थ्यास तो बारावीत असतानाच्या ऑगस्ट मध्ये प्रथम परीक्षेची संधी मिळते यात तो यशस्वी झाल्यास NDAत दाखल होऊ शकतो म्हणूनच विद्यार्थ्यांस ११वी १२वी चा अभ्यास १२वीत जाण्यापुर्वी संपवावा लागतो. या साठी १० वीच्या परीक्षेनंतरच जर त्याने तयारी सुरु केली तर त्यास यात यश मिळवणे सोपे जाते.
गणित, इंग्रजी हे NDAच्या परिक्षेचे महत्ताचे विषय असल्याने या विषयात प्राविण्य मिळवण्यासाठी १०वी नंतरच्या मोठ्या सुट्टीचा वापर करावा. त्याच बरोबरच इतिहास, भूगोल या विषयांचे वाचन व अभ्यास करावा. याचा परिक्षे बरोबरच व्यत्त्किमत्व विकासासाठी त्यास उपयोग होईल व सुट्टीही मजेत जाईल तसेच या सुट्टीत एखादी परकीय भाषा शिकल्यास व व्यायामाची सवय जोपासल्यास त्याचा फायदा मिळेल.
११ वी प्रवेशाची तयारी :
११ वीत प्रवेश घेताना दोन मुद्यांचा विचार करावा
1) NDAपरीक्षा पास होण्यासाठी विषय निवडणे
2) NDAपरीक्षा पास न झाल्यास जो कोर्स निवडायचा असेल त्यानुसार आहे. ज्या विद्यार्थ्यांना एयर फोर्स किंवा नेव्ही ऑप्शन्स् निवडायचे आहेत. त्यांना शास्त्र शाखा अनिवार्य आहे. कला आणि वाणिज्य शाखा निवडल्यास आर्मी हा एकमेव पर्याय शिल्लक राहील.
शास्त्र शाखा निवडल्यास गणित, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र हे विषय असलेच पाहिजेत. उरलेल्या विषयांसाठी जीवशास्त्र किंवा भुगोल व एक परकीय भाषा असे विषय निवडावेत. कला शाखा निवडल्यास गणित, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र,इंग्रजी, एक परकीय भाषा व अन्य आपल्या आवडीप्रमाणे विषय निवडावेत. वाणिज्य शाखा निवडल्यास गणित, इंग्रजी, इकॉनॉमिक्स्, अकांऊटस् व आपल्या आवडीप्रमाणे अन्य विषय निवडावेत. श्स पद्धतीने विषय निवडल्यास लेखी परीक्षेची तयारी व ११वी १२वी ची तयारी समान राहिल्याने आपणास NDA व ११वी १२वी साठी वेगळा वेगळा अभ्यास करावा लागणार नाही. त्यामूळे वेळही वाचेल व यश मिळवणे सोपे जाईल. शक्यतो वाणिज्य शाखा निवडू नये.
योग्य प्रवेश झाल्यानंतर आता तयारी लेखी परीक्षेची :
लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ११ वी १२वी चा अभ्यासक्रम १२वी च्या ऑगस्टपुर्वी संपवणे आवश्यक आहे. लेखी परीक्षा पुढीलप्रमाणे असते.
१) लेखी परीक्षेत दोन पेपर असतात. पहिला-गणित 300 मार्कांचा-साधारणत: 11वी 12वी च्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित,दुसरा पेपर -सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल ॲबिलीटी टेस्ट 600 मार्कांचा- या पेपरचे एकूण तीन भाग पडतात पहिला भाग - इंग्रजी 200 मार्क,दुसरा भाग - शास्त्र 200 मार्कस्, तीसरा भाग - इतिहास, भूगोल, सामान्यज्ञान व चालू घटना एकूण 200 मार्कस् प्रत्येक पेपर अडीच तासांचा असतो. प्रत्येक प्रश्नास चार पर्याय असतात. त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा असतो. चुकीच्या उत्तरास निगेटीव्ह मार्किंग प्रमाणे गुण कमी केले जातात. गणिताच्या पेपरमध्ये 120 प्रश्न असतात. तर दुसऱ्या पेपरमध्ये 150 प्रश्न असतात. त्यामूळे कमी वेळामध्ये अधिका अधिक प्रश्न सोडवण्याचा सराव करावा लागतो. लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी सर्वप्रथम सर्व अभ्यासक्रमाची थेअरी उत्तम करावी व त्यानंतर कमी वेळेत प्रश्न सोडवण्यासाठी सराव करावा. प्रश्न सोडविण्याच्या युक्त्या तयार कराव्यात.
लेखी परिक्षेचे दोन्ही पेपर एकाच दिवशी असतात. पहिला पेपर गणिताचा 10 ते 12.30 व दूसरा पेपर 2 ते 4.30 या वेळात असतो. महाराष्ट्रात ही परिक्षा मुंबई व नागपूर येथील केंद्रांवर देता येते.
लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पत्राद्वारे कळविण्यात येते तसेच मुलाखतीची तारीख वेळ कळविली जाते. सर्वसाधारणपणे तीन महिन्यांनी वरील वेबसाईटवर निकाल पहाता येतो. तसेच मुलाखतीची तारीख व माहिती मिळवता येते.
प्रत्यक्ष फॉर्म भरण्यापासून ते अकादमीत दाखल होण्यापर्यंतचा असा एक वर्षाचा कार्यक्रम आहे. त्याचे ठळक मुद्दे पुढील प्रमाणे
१)फॉर्म भरणे (१ महिना)
२)ही परिक्षा वर्षातून दोनदा होते त्यामुळे नोव्हेंबर व मार्च अश्या दोन्ही महिन्यात फॉर्म उपलब्ध होतात प्रत्यक्ष वेळापत्रक www.upsc.gov.in या वेबसाईटवर तपासावे.
३)लेखी परिक्षा- फॉर्म भरणे संपल्यानंतर ५ महिन्यांनी एप्रिल व ऑगस्ट अनुक्रमे (तपशील पुढे पहा)
५)साधारणपणे २७ डिसेंबर किंवा २७ जून अनुक्रमे विद्यार्थ्यी अकादमीत प्रवेश मिळवतात.
मुलाखत परीक्षा :
ही परिक्षा एकूण सात दिवसांची असते. त्याचे दोन भाग असतात. पहिल्या भागास चाळणी परीक्षा असे म्हणतात. यात उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यी मुलाखतीच्या दुसऱ्या भागात जातात व अनुर्त्तीण विद्यार्थ्यास परत पाठविले जाते. मुलाखत परीक्षेत वेगवेगळ्या प्रकारच्या सायकॉलॉजी टेस्ट तसेच ग्राऊंड टेस्टस् होतात. मुलाखत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास NDA साठी रेक्मेंड केले जाते. अश्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करतात. व त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याची गुणवत्ता यादी तयार केली जाते. या यादी प्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. परीक्षेच्या कुठल्याही स्टेजला अनुत्तीर्ण झाल्यास परत प्रथम तयारी करावी लागते.
समज गैर समज:
या परीक्षेबाबत अनेक गैर समज आढळून येतात. जसे विद्यार्थ्यांची तब्येत अतिशय धडधाकट असणे तो कराटे चॅम्पियन असणे किंवा त्याचे कुणीतरी सैन्यदलात अधिकारी असणे किंवा सैनिक शाळेत असणे आवश्यक आहे; अशी चुकीची समजूत आहे. प्रत्यक्षात तो विद्यार्थ्यी केवळ प्रशिक्षणास सक्षम असणे व त्याने परीक्षेत गुणवत्ता यादीत येणे पुरेसे आहे. NDA त प्रवेशासाठी कोणत्याही राखीव जागा किंवा आरक्षण नाहीत. त्यामूळे अश्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.